कोल्हापूर जिल्ह्यात तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी
schedule28 May 25 person by visibility 80 categoryराजकीय

कोल्हापूर; जिल्ह्यात मे 2025 मध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीसह इतर क्षेत्रांमध्ये नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतमालांचे, घरे, जनावरे तसेच रस्ते व पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक वाया गेले असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी रु.५० हजार ची तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य शासनाने अवकाळी पावसाला 'राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती' (State-Specific Natural Disaster) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) च्या वार्षिक अनुदानाच्या 10% पर्यंत निधीचा वापर करून अशा आपत्तीमधील बाधित नागरिकांना तात्काळ मदत पुरविणे शक्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाधित क्षेत्राचे व इतर घटकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त नागरीकांना आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यात मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.यावेळी आमदार सतेज पाटील,खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील,
शिवसेनेचे संजय पवार विजय देवणे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार आर के पवार, आदी मान्यवर उपस्थित होते