बाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवार
schedule06 May 26 person by visibility 31 category
कोल्हापूर:
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन विद्यमान संचालकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे बाजार समितीच्या मालकीची जागा भाडेतत्वावर घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी या तिन्ही संचालकांना नोटीस बजावली असून, त्यांना सदस्य पदावरून अपात्र का घोषित करू नये, अशी विचारणा केली आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, बाजार समितीच्या नवीन दुकान गाळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सुमारे ३६०० चौरस फूट टेरेसची जागा तीन संचालकांच्या नातेवाईकांनी मिळून भाडेतत्वावर घेतली आहे.
या संचालकांवर आहे टांगती तलवार:
१. शेखर शंकरराव देसाई: यांच्या पत्नी सौ. स्नेहा शेखर देसाई यांच्या नावे अर्ज आहे.
२. सुयोग सुभाष चौगले वाडकर: यांच्या पत्नी सौ. वर्षा सुयोग चौगले यांच्या नावे अर्ज आहे.
३. भारत बाबासो पाटील: यांचा मुलगा श्री. वरदराज भारत पाटील यांच्या नावे अर्ज आहे.
नियमांचे उल्लंघन
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (निवडणूक) नियम २०१७ मधील नियम १० (१) (ह) नुसार, जर एखाद्या सदस्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजार समितीच्या कोणत्याही संविधेत किंवा मालमत्तेत हितसंबंध असतील, तर तो सदस्य पदासाठी अपात्र ठरतो. या प्रकरणात संचालकांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे २९ वर्षांच्या कराराने ही मालमत्ता घेण्यात आली असून, यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये ठराव करण्यात आला होता.
पुढील कारवाई
जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित संचालकांना १९ मे २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जर हा खुलासा असमाधानकारक आढळला किंवा संबंधित संचालक गैरहजर राहिले, तर त्यांना पदावरून काढून टाकण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या नोटीसमुळे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता जिल्हा उपनिबंधक यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.