राष्ट्रीय शेतकरी दिन
schedule23 Dec 21 person by visibility 355 categoryशैक्षणिक

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे. देशात आजही मोठ्या प्रमाणात लोक शेती व त्यावर आधारित उद्योगधंद्यात व व्यवसायात गुंतलेले आहेत. शेतकऱ्याचे समाजातील महत्व, आर्थिक व सामाजिक विकास या हेतूने शेतकरी दिन साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भरीव कामगिरी करणारे भारताचे पाचवे पंतप्रधान चरणसिंग यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर दिवस दरवर्षी भारतीय शेतकरी दिन अर्थात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या प्राकृतिक रचनेचा आढावा घेता असे दिसते की उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय व्दीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी प्रदेश व भारतीय बेटे यानुसार शेतीमध्ये विविधता आहे. प्राकृतिक रचनेनुसार देशात पिकपध्दती दिसून येते व कृषीक्षेत्राचा विकास ही.आज देशात शेती व शेतकऱ्यांपुढे विविध प्रश्न व आव्हाने निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. या दिनानिमित्त त्या प्रश्नावर भाष्य करणे व चर्चा करणे अपेक्षित आहे. पावसाची अनियमितता, हवामान बदल, तापमान वाढ, नैसर्गिक आपत्ती, महापूर, दुष्काळ, वादळे या प्रश्नाबरोबरच आर्थिक व राजकीय प्रश्न ही शेतीसमोर आहेत. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ही चिंतेचा विषय आहे. त्याप्रश्नावर लक्ष देणे व उपाय करणे गरजेचे बनले आहे. सध्या शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देणे. कृषीक्षेत्रात जास्त गुंतुवणूक केली तर देशाच्या आर्थिक विकासाला मदत होईल. कोरोनामुळे सध्या मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. शहरातील लोक ग्रामीण भागाकडे स्थलांतरीत होत आहेत त्यामुळे ग्रामीण भागावर शेतीक्षेत्रावर लक्ष दिले तर रोजगाराबरोबरच ग्रामीण विकासाची ही संधी आहे. शेतीमध्ये नवीन बदल करणे, आधुनिक तंत्रज्ञान, पिकपध्दती, कृषी बाजार पेठा, कृषी उत्पादने यांना हमी भाव देणे, पिकविमा व सरंक्षण, शेतीक्षेत्रात भाडंवल निर्मिती आदी बाबीवर लक्ष केंद्रित केले तर नक्कीच कृषी क्षेत्राला, शेतकऱ्यांना उभारी मिळेल व देशाच्या विकासाला मदत होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक,
कोल्हापूर
मो.9923497593
ईमेल: ysmote@gmail.com