जिल्हा परिषदेच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा :पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
schedule26 May 25 person by visibility 37 category
• *जिल्हा परिषदेच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा*
*कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येत असतात. सुक्ष्म नियोजन करुन जिल्हा परिषदेच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यत पोहोचवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.*
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनिषा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) अरुण जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अतुल अकुर्डे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेशी संबंधित विविध विषय मार्गी लावण्यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत विविध घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची व्यापक प्रसिद्धी करुन त्याची माहिती लाभार्थ्यां पर्यंत पोहोचवा. कोणताही लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामकाज केले जाणार आहे. जिल्हा परिषदेंतर्गत 50 हजार घरकुल वाटप करण्यात येणार आहे. याचे नियोजन करुन घरकुल योजनेचे लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना द्या. दिव्यांगांचे प्रश्न वेळेत मार्गी लावा, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक व पदोन्नतीचे कोणतेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्या, जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमध्ये तसेच विविध विभागात खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तू व उपकरणांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करून घेऊन त्याचा योग्य वापर होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देवून ते म्हणाले, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे होत आहे. दुषित पाण्यापासून लोकांना आजार उद्भवत असल्याने ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरण करुन घ्यावे. याबाबत आरोग्य व पाणीपुरवठा विभागांने समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राजीव गांधी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गावाचा विकास होण्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावांच्या विकासामध्ये योगदान देता येईल. जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यात उत्कृष्ट असून जिल्हा परिषदेच्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी प्रगती साधतील. पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून चांगल्या प्रकारे कामकाज करत आहे. विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करुन कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्व बाबतीत अग्रेसर म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण करुया, असेही ते म्हणाले.
सुरुवातीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या विभागांची थोडक्यात माहिती दिली. तसेच विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांची माहिती सादरीकरणाव्दारे सादर केली.
*******