अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजकार्याचा वसा: आशा धनाले यांचे प्रेरणादायी कार्य
schedule05 Mar 26 person by visibility 29 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर :
केवळ पदव्या मिळवून शिक्षण पूर्ण होत नाही, तर त्या शिक्षणाचा उपयोग समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करणे हीच खरी समाजसेवा आहे, हे मिरज येथील आशा रुद्राप्पा धनाले यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. गेली १२ वर्षे त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत.
आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशनाचा हात
आशा धनाले यांनी २०१३ पासून समाजकार्याला सुरुवात केली. केवळ शिकवण्या घेण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना आणि स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महिलेला आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढले. योग्य समुपदेशन आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीने आज ही व्यक्ती सामान्य जीवन जगत आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार
'महाराष्ट्र अंनिस'च्या सांगली शाखा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक धाडसी कामे केली आहेत:
भोंदूगिरीचा पर्दाफाश: पोलिसांच्या मदतीने लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बुवांचे पितळ उघडे पाडले.
हसत-खेळत विज्ञान: सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील १३० शाळांमधील २०,००० विद्यार्थ्यांपर्यंत प्रयोगांद्वारे विज्ञानाची गोडी निर्माण केली.
महिला प्रबोधन: 'अंधश्रद्धेची चौकट तोडा, विज्ञानाशी नाते जोडा' या उपक्रमांतर्गत नाट्य, भारूड आणि गाण्यांच्या माध्यमातून ६५ पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केले.
साहित्यिक आणि सामाजिक गौरव
त्या केवळ कार्यकर्त्याच नाहीत, तर एक संवेदनशील कवयित्री आणि लेखिका देखील आहेत. सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन त्यांना:
१) सिद्धकला सामाजिक संस्थेचा 'समाजरत्न पुरस्कार'
२) महाराष्ट्र अंनिसचा 'प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.
"जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन घराघरात पोहोचवून एक सक्षम समाज निर्माण करणे, हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे."
— आशा धनाले