परप्रांतीय कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी
schedule21 May 26 person by visibility 32 categoryराजकीयगुन्हे
कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा व औद्योगिक क्षेत्रामध्ये (MIDC) गेल्या १० वर्षांत परप्रांतीय कामगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, या कामगारांची कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा अधिकृत नोंद पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. याचा गैरफायदा घेऊन इतर राज्यांतून गुन्हे करून आलेले गुन्हेगार येथे आश्रय घेत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारी, अत्याचार आणि दरोड्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व परप्रांतीयांची संपूर्ण माहिती संकलित करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई पक्षा) च्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातील एक सविस्तर निवेदन रि.पा.ई. चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले.
वाढत्या गुन्हेगारीमुळे कोल्हापूरच्या शांततेला धक्का
निवेदनात नमूद केल्यानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतून आलेले अनेक कामगार सुरुवातीला औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये किंवा छोट्या-मोठ्या कामांवर रोजंदारीने रुजू होतात. मात्र, काही महिन्यांतच येथील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांच्या वागण्यात उर्मटपणा आणि बिनधास्तपणा येतो. यातूनच मारामारी, जीवघेणे हल्ले, खून आणि आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अनेक निर्ढावलेले गुन्हेगार कोल्हापुरात दरोडे व लुटमार करून थेट आपल्या मूळ गावी पसार होतात.
महिला व बालकांवरील अत्याचार चिंताजनक
रि.पा.ई. ने निवेदनात अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केला असून, काही परप्रांतीय विकृतांकडून लहान मुली व महिलांवर अत्याचार करून त्यांचे खून करण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहेत. कोल्हापूरसारख्या पुरोगामी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांच्या जिल्ह्यात अशा घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे, असे पक्षाने म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन
"पोलीस प्रशासनाने तातडीने जबाबदारी घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमधून आणि औद्योगिक वसाहतींमधून परप्रांतीयांची संपूर्ण माहिती व ओळख पटवणारी कागदपत्रे गोळा करावीत. यामुळे कोणतीही अकस्मात किंवा गुन्हेगारी घटना घडल्यास आरोपीला तात्काळ पकडणे पोलिसांना सोपे होईल आणि गुन्हेगारांवर वेळीच चाप बसेल."
— बबनराव शिंदे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रि.पा.ई. गवई गट)
या निवेदन प्रसंगी जिल्हा सरचिटणीस संदीप हेर्लेकर, अप्पासाहेब कांबळे, शामराव भोसले, सुरेश कुरणे, विजय जाधव, प्रवीण शिंदे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.