डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात
schedule24 Aug 26 person by visibility 67 category
पोलिसांच्या आवाहनाला ‘वाय. पी. पोवार’ मंडळाचा सलाम!
— मिरवणुकीऐवजी जागेवरच मूर्ती अनावरण
कोल्हापूर : आवाज इंडिया
गणेशोत्सव हा उत्सवाचा, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचा उत्सव व्हावा, यासाठी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला शहरातील गणेशोत्सव मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलेल्या डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळाने यंदा आगळा आदर्श घालून दिला आहे.
मंडळाने गणेशमूर्तीच्या आगमनावेळी मोठी मिरवणूक न काढता पारंपरिक वाद्यांच्या गजरात जागेवरच मूर्ती अनावरण सोहळा केला. तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले.
याबद्दल आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक नियाज खान उपस्थित होते.
कोल्हापुरातील गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन विविध सूचना केल्या होत्या. डॉल्बीचा वापर टाळावा, प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेत आणि दिवशीच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढावी, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर अनाथाश्रम, अंधशाळा तसेच विद्यार्थ्यांना मदत यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
‘एकाच दिवशी आगमन, एकाच दिवशी विसर्जन’ या पोलिसांच्या भूमिकेलाही मंडळांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळाने घेतलेला निर्णय विशेष चर्चेचा ठरला आहे.
मंडळाकडून आता याच ठिकाणी श्री गणेशमूर्तीसाठी मंडप उभारण्यात येणार असून, संपूर्ण उत्सव काळात पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी वाय. पी. पोवार मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शहरातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राजारामपुरी पोलीस निरीक्षक विकास जाधव, अंमलदार साजिद गवंडी, संदीप निळकपनकर यांच्यासह विरेंद्र पोळ,रविकिरण गवळी ,अमित माने ,सौरभ पाटील , सिद्धार्थ पोळ आणि कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘शांततेचा उत्सव’ घडविणाऱ्या मंडळाचा आदर्श
उत्सवाचा जल्लोष कमी न करता ध्वनिप्रदूषणाला आळा, मिरवणुकीऐवजी जागेवरच मूर्ती अनावरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प—वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळाने पोलिसांच्या आवाहनाला केवळ प्रतिसादच दिला नाही, तर इतर मंडळांसमोर एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे.